जन-कला: नोंदी महानगरातल्या (भाग – २)



गेल्या भागात म्हणल्याप्रमाणे बंगलुरू शहरात कलाकारांनी एकत्र येऊन 'कलेक्टिव्स' सुरू केले. याला सुरूवात झाली २००० नंतर. हे बंगलुरू मध्येच का घडलं? या शहराचं वेगळेपण काय आहे हे देखील पाहायला हवं. या शहराला कलाकारांनी असे उपक्रम सुरू करायचा इतिहास आहेच. त्याचबरोबर, आणखी एक महत्त्वाची गोष्ट कारणीभूत ठरली ती म्हणजे दिल्ली किंवा मुंबईसारखी या शहरात खाजगी कलादालनांची व्यवस्था फारशी इथं अस्तित्वात नसणं. त्याच बरोबर कलाशाळातून बाहेर पडल्यावर या नवोदित कलाकारांनी काय करायचं, कलाकरांच्या नेटवर्कचा भाग कसं बनायचं, आपली कला जाणकारांसमोर कुठे प्रदर्शित करायची अशा प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करत हे कलेक्टिव्स अस्तित्वात आले. यातल्या कलाकारांनी आपला कलाव्यवहार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठीही प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी नावीन्यपूर्ण कलाप्रकार, कल्पक रचनात्मक मांडणी यांना स्विकारलं, प्रयोगातून जुन्या रचना मोडून काढून शहाराच्या कलापटलावर अनेक नव्या रचना उभारायला सुरूवात केली. साधारण २००० च्या दशकात समुहा, जागा, बार-वन, १ शांतीरोड यासारखे कलेक्टिव्स इथं उभे राहिले. इथल्या तरूण कलाकारांशी बोलताना लक्षात आलं की २००२ साली इथं 'खोज' या संस्थेनं आयोजित केलेल्या कार्यशाळेचा फार खोलवर परिणाम या कलाकारांच्या कलानिर्मिती प्रक्रियेवर घडून आला. आधी म्हणलं त्याप्रमाणे यांची संकल्पनात्म मांडणी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी हे केवळ कलाकारांनी केलं. हे प्रकल्प शहराच्या सांस्कृतिक जीवनात भर घालणारे ठरले. या प्रकल्पांकडे हे कलाकार त्यांच्या कलाव्यवहाराचा एक भाग म्हणून बघत होते, आहेत. पण ते कलाकार म्हणून स्वत्वाची व्याप्ती वाढवत इथं 'कलाकार' किंवा 'क्युरेटर' न राहाता फॅसिलिटेटर बनतात, ते कला प्रकल्पांची जोडणी करतात, लोकांना यात सहभागी होण्यास आणि त्यातून कलानिर्मिती करण्यास उद्युक्त करतात. इतर अनेक कलाकार आणि सर्जनशील व्यक्तींना एकत्र आणून त्यातून हे कला-प्रकल्प आकाराला येतात आणि यशस्वीरित्या पार पाडतात. त्यामुळे त्यात कुठलीही पक्की संस्थात्मक रचना न आणता ते कला-प्रकल्पांसारखेच चालवले गेले. त्यातले काही मर्यादित कालावधीकरिता चालवले गेले तर काही दीर्घकालीन ठरले. सुरेश कुमार जी., अर्चना प्रसाद आणि शिवप्रसाद यांची संकल्पना असलेला 'समुहा' हा कला-प्रकल्प ४१४ दिवस सलग चालवला गेला, यात २३ सभासद कलाकारांना प्रत्येकी १७ दिवस कला निर्मिती आणि प्रदर्शनासाठी मिळाले. त्या सोबत, समकालीन कलेवर चर्चा, कार्यशाळा, मांडणीही आयोजित केल्या गेल्या. तसंच 'बार-वन' ही रेसिडन्सी २००७ पासून २०१२ पर्यंत चालू होती. यात भारतातील आणि बाहेरील देखील अनेक समकालीन कलाकार बंगलुरू मध्ये राहून काम करून गेले. बंगलुरू शहराचे सांस्कृतिक, सामाजिक संदर्भ आणि त्या कलाकारांचा कलाव्यवहार यातून या रेसिडन्सीज् आकाराला आल्या

'जागा'ची इमारत
 
मल्लेश्वरम कॉलिंग, अर्चना प्रसाद, जागा


या सगळ्याचे पडसाद बंगलुरू मधल्या कलाकारांच्या वैयक्तिक पातळीवर आणि कलाव्यवहारावर देखील पडलेले दिसतात. साधारण २००० च्या आसपास समुहाच्या सुरेश यांनी कलावस्तू बनवणं बंद केलं. सध्याच्या आर्थिक रचनेत आणि कलाबाजारात कलावस्तूचे विषयवस्तूकरण होण्याची प्रक्रिया सहजपणे घडते. त्याला विरोध म्हणून त्यांचं शिक्षण शिल्पकलेत झालं असलं तरी त्यांनी स्वतःचं शरीर माध्यम म्हणून वापरायला सुरूवात केली. सुरेश यांचा कला व्यवहार हा साइट स्पेसिफिक म्हणजे स्थल-निष्ठ आहे. सार्वजनिक अवकाशात वावरताना तिथले तपशील घेऊन त्यांना जोडून घेत ते त्यांचा परफॉर्मन्स आकाराला आणतात ज्याला ते 'लाइव आर्ट' अशी व्याख्या वापरतात. हा कुठल्याही प्रकारचा तालमी करून किंवा ठराविक कथन असलेला परफॉर्मन्स नसून त्या त्या ठिकाणच्या संदर्भातून आकाराला येणारा कलाप्रकार आहे. त्यामुळेच तो तात्कालिकही आहे आणि तो एक़ हस्तक्षेपही आहे. तो त्या ठराविक काल आणि अवकाशात उपलब्ध असतो, प्रेक्षकांना भिडतो, त्यांच्याशी संवाद साधतो. शहराचं अवकाश सुरेश यांच्यासाठी साइट बनते, त्यांच्या कला व्यवहाराला त्यामुळे अनेक पदर प्राप्त होतात. 'समुहा' हा प्रकल्पदेखील त्यांच्या कलाव्यवहाराचा भाग म्हणूनच त्यांनी आकाराला आणला. हे नवोदित कलाकारांसाठी, एकमेकांचा कलाव्यवहार समजून घेत एकत्र येऊन कलेचं चर्चाविश्व घडवण्यासाठीचं एक व्यासपीठ बनला. 'समुहा'च्या काळातच कलाकारांच्या चर्चा आणि विचारविनिमयातून 'जागा'ची कल्पनाही पुढे आली. सुरुवातीच्या काळात कायमस्वरूपी कलासंस्था न उभारता कमी वजनाच्या पोलादी पट्ट्या जोडून तात्पुरत्या उभारलेल्या इमारतीत त्यांनी काम सुरू केले. याचा फायदा असा झाला की ही इमारत सहजपणे कुठेही उचलून घेऊन जाणं शक्य होतं. उपलब्ध असलेल्या जागेनुसार रचना करत नंतर त्यांनी 'जागा'ची बांधणी केली.
गेल्या आठ-दहा वर्षात 'जागा' मध्ये वर्टिकल गार्डन पासून भित्तीचित्रांपर्यंत आणि मौखिक इतिहास व स्मृती याच्याकडे संसाधन म्हणून पाहाण्यापासून पासून पर्यावरणाचे मुद्दे हाताळण्यापर्यंत अनेक कला-प्रकल्प सादर केले गेले. शहरातले काही शेजार, जुन्या वस्ती, त्याचबरोबर, नव्याने बांधलेल्या उड्डाणपुलांखालच्या जागा, जुन्या वापरात नसलेल्या इमारती, बस स्थानके यासारख्या ठिकाणी त्यांनी लोक-सहभागातून प्रकल्प साकारले. इंडिया फौंडेशन फॉर द आर्ट्स यांच्या प्रोजेक्ट ५६० या कार्यक्रमांतर्गत पार पाडलेल्या 'मल्लेश्वरम् कॉलिंग' या प्रकल्पात अर्चना प्रसाद यांनी यशवंतपूर उड्डाणपुलाच्याखाली एक फोनबुथ उभारलं. कालबाह्य झालेल्या लाल रंगाच्या या बुथमध्ये गोल डायलचा फोन बसवला होता. आत गेलं की फोन वाजायचा आणि फोन उचलला की त्यावर मल्लेश्वरमबदद्दलच्या आठवणी, कथा, गेल्या ४०-५० वर्षात झालेले बदल तिथल्या रहिवाशांच्या आवाजात प्रेक्षकांना एेकू यायच्या. धावपळीच्या रस्त्यावरून जाताना क्षणभर थांबून लोक त्या बुथमध्ये आल्यावर त्यांच्या स्मृती जागवणं, त्यातून शहराबद्दलची, भूतकाळाबद्दलची जाणीव निर्माण करणं आणि येत्या काळातल्या शहराविषयी विचार करायला लावणं हे सगळं यातून घडत गेलं. अस्ताव्यस्त पसरत जाणाऱ्या या शहरातल्या अशा काही गोष्टी तिथल्या माणसांना एकत्र आणतील, त्यांना एकमेकांशी जोडतील या विचारातून हा प्रकल्प त्यांनी हाती घेतला


समुहा सुरेश

 
आर्ट इन ट्रांजिट प्रकल्प, पिनीया मेट्रो स्टेशन

याच्याच जोडीने त्यांनी उड्डाणपुलांच्या खालचे खांब रंगवण्याचं कामही स्थानिक लोक, कर्मचारी आणि कला-विद्यार्थी यांच्या साहाय्याने केलं. या ठिकाणांचं वैशिष्ट्य असं आहे की लोक तिथे थांबून कलाकृती बघू शकत नाहीत तर ते मुख्यतः प्रवासादरम्यान, कामाच्या वाटेवर असताना, घाईच्या वेळेला एखादी नजर फिरवतात. त्यानुसारच उड्डाणपुलांच्या खांबांवर चितारलेल्या आकृतींचे आशय आशय, रंग आणि घाट ठरतात. याच धर्तीवरचा दुसरा प्रकल्प आहे सृष्टी स्कूल अॉफ आर्ट, डिजाइन अॅंड टेक्नॉलॉजी या संस्थेनी मेट्रो रेल कॉर्पोरेशन बरोबर साकारलेला 'आर्ट इन ट्रांझिट' प्रकल्प. मेट्रोच्या स्थानकांवरती केलेली भित्तिचित्रे, मांडणी शिल्प याला एक वेगळं महत्त्व आहे कारण हे कला-शिक्षक आणि कलेचे विद्यार्थी तसेच कलासंस्था आणि सरकारी संस्था यांच्या सहयोगातून निर्माण झालेले आहे. बंगलुरू हे शहर एक मेट्रोपॉलिटन शहर म्हणून वाढत जाताना, त्याची रचना, विकास, त्यातल्या इन्फ्रास्ट्रक्चर याचा सर्वांगीण विचार करण्याचा प्रयत्न करत या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पांवर काम केले. पण त्यातही महत्वाची गोष्ट होती कुठल्या प्रतिमा त्यांनी तयार केल्या, वापरल्या आणि त्याचे संदर्भ आणि कारणं नेमकी काय होती. या प्रकल्पाची साईट जरी मेट्रो प्राधिकरणानी नेमून दिली असली तरी ती साईट, आजूबाजूचं वातावरण, तिथला इतिहास, लोकसमूह, प्रवासी हे सगळं समजून घेऊन विद्यार्थ्यांनी आपापल्या कलाकृती साकारल्या. प्राधिकरणाचा उद्देश जरी केवळ मेट्रो स्टेशनला आकर्षक रूप देणं असलं तरी कलाकार म्हणून हा प्रकल्प त्या पलिकडे नेण्यात हे विद्यार्थी यशस्वी झाले का असाही एक प्रश्न आहे. काहींनी ग्राफीटी किंवा स्ट्रीट आर्टचा वापर केला तर काहींनी तिथले रंग, आकार, वास्तुरचना यांचा आधार घेत त्यांच्या कलाकृती बनवल्या. यातल्या कलाकृतींपेक्षा विद्यार्थ्यांनी वापरलेली संशोधन पद्धती आणि अकादमीक संस्थेनी जनकलेसारख्या विषयाला मुख्यस्त्रोतात आणत संस्थात्मक पातळीवर सुरू केलेले प्रयोग या दृष्टीने त्याचं महत्त्व अधिक आहे.

अर्थात, ग्राफिटीचे भारतातले संदर्भ काय, इतिहास काय असे प्रश्न उरतातच. पण त्याचबरोबर, हे कलाकार नेमकी कोणती कलाभाषा निवडतात? ही निवड जाणीवपूर्वक असते की नसते? आपल्या शहरांचे बदलते ढाचे हे कुठल्या प्रकारचा प्रेक्षकवर्ग घडवताहेत? कलाकारांचे कलेक्टिव्स हे त्या त्या शहराची कला-संस्कृती ठरवतात, बनवतात, कलाव्यवहाराच्या दिशा ठरवतात तसंच सार्वजनिक अवकाशातल्या कलाव्यवहारावर त्यांचा काय परिणाम झालेला दिसतो? तो अधिक व्यामिश्र आणि प्रगल्भ होतो का? अशाप्रकारे इतर शहरांमध्ये या प्रकारच्या कोणत्या प्रक्रिया घडताना दिसतात आणि तिथले जन-कला व्यवहार कोणत्या मुशीतून घडतात आणि त्यांचे दूरगामी परिणाम एकूणच तिथल्या आणि एकंदर भारतीय समकालीन कलाव्यवहारावर आणि कलेच्या चर्चाविश्वावर कसे होताना दिसतात हे पाहणं या एकूणच प्रवासात महत्वाचं ठरणार आहे

पूर्वप्रसिद्धी: पुरोगामी जनगर्जना, पुणे | मे, २०१६
छायाचित्र सौजन्य: अर्चना प्रसाद, सुरेशकुमार जी. सृष्टी स्कूल अॉफ आर्ट, डिजाईन अॅंड टेक्नॉलॉजी, बंगलुरू.  

No comments:

Post a Comment